"झुंजार, मी मानाजीला शोधायला अवश्य येईन, पण लक्षात ठेव, या मोहिमेवरून परत येणं जवळ जवळ अशक्यच," हिम्मतने झुंजारला मोहिमेतील धोका अधोरेखित करीत सांगितले.
मृत्यूगुहेतील खजिना हा हिम्मतने सांगितलेला एक विलक्षण चित्तथरारक अनुभव आहे, ज्यात तो झुंजारच्या हरवलेल्या भावाला शोधण्यासाठी मृत्युगुहेत जातो, आणि त्यांचा हा विलक्षण प्रवास, गूढ आणि अनाकलनीय ठिकाणांवरून, दऱ्याखोऱ्यातून, चेटकिणी आणि जंगली माणसांमधून, हिंस्त्र श्वापदां मधून होतो... मग ती मृत्यूगुहा असो वा चंड पर्वत, सैतानरक्षित लाल-भिंत असो वा तीन पुतळ्यांची—दगडी देवांच्या अधिपत्याखाली येणारी वेताळ दरी. प्रश्न हा आहे कि इतक्या भयानक ठिकाणांवरून मार्गक्रमण करतांना किंवा निर्बीड जंगलातून व मरणाच्या उष्ण वाळवंटातून अन्न-पाण्याविना प्रवास करताना अशा मोहिमेचा शेवट आनंदी होण्याची अपेक्षा करता येईल का?
हा प्रवास वाचकालाही शोध मोहिमेवर जाणाऱ्या टोळक्यातला एक भाग करून ह्या रोमांचकारी प्रवासाची प्रत्यक्ष अनुभूती देतो. रोमांचक तितकाच थरारक! हिम्मत उगीच नाही सांगत, संकटं अशी गुंफली होती कि जणू एखाद्या चित्रपटाची शृंखलाच. प्रत्येक कडी दुसरीला अडकवून ठेवणारी... प्रत्येक आवर्तन, मागच्या पेक्षा कठीण व पुढच्या पेक्षा सोपे… आम्हांला आमच्या चुकीसाठी माफ न करणारं… ज्या क्षणी त्याचा अनादर होईल, त्या क्षणी मृत्यूशी गाठ घालून देणारं... घटना अशा घडत होत्या जशी एखादी सिद्धी तिच्या परमोच्च बिंदूकडे हळू हळू सरकावी... ती सिद्धी तारक की मारक हे काळच ठरवणार होता.
ही चित्र-कथा लहान मुलांना नक्कीच एक नवीन साहस-विश्व अनुभवण्यास मदत करेल.
काय तर मग, होताय या रोमहर्षक सफरीचा एक भाग? चला तर मग मृत्यूगुहेतील खजिन्याच्या शोधात.